TOD Marathi

मुंबई: ‘राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला’, असं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा-गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्यानंतर केलं होतं. या विधानामुळे महाविकास आघाडीत आता वातावरण गरम होण्याची शक्यता आहे. भंडारा गोंदियात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला एकाकी पाडण्यात आलं. राष्ट्रवादीने भाजपसोबत आघाडी केल्याने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले संतापले आहेत. आणि आपली नाराजी व्यक्त करणारं ट्वीट त्यांनी केलं होतं.

यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल भाष्य केलं होतं, त्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रतिक्रीया दिली आहे. नाना पटोलेंचं हे वक्तव्य हास्यास्पद असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ते कोणत्या पक्षातून काँगेसमध्ये आले, याचा त्यांची विचार करावा, असा टोलाही अजित पवार यांनी लगावलाय.

आता भाजप म्हणणार का की आमच्या पाठीत खंजीर खुपसला, असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला. आमचं महाविकास आघाडी सरकार आहे. महाविकास आघाडी असेल तरच १४५ हा आकडा गाठणं शक्य आहे, असं पवारांनी म्हटलं.

प्रत्येक जिल्ह्यात वेगळ्या घटना घडतात, तिथली राजकीय परिस्थिती वेगळी असते, जिल्हा पातळीवर काही निर्णय घेण्याची मुभा स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिली आहे. सगळीकडे वातावरण नीट राहावे असे प्रयत्न होतात. यापूर्वी काँग्रेसही काही तालुक्याच्या ठिकाणी भाजप बरोबर होतं. त्यामुळे जबाबदार नेत्यांनी वक्तव्य करत असताना आपल्या वक्तव्याचा परिणाम काय होईल याचा विचार करून वक्त्यव्य करावे, असं म्हणत अजित पवारांनी त्यांचे कान टोचले आहेत.

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असेल तरच बहुमताचा १४५ आकडा होतो आणि आम्ही तिघे एकत्र येत महाविकास आघाडी म्हणून सत्तेत आहोत हेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.